Monday, January 10, 2022

समाजातील वाढत्या आत्महत्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास

 भारतीय समाजातील वाढत्या आत्महत्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास . 


प्रा. गंगाधर बा. चव्हाण

कन्या महाविद्यालय मिरज

chavangangadhar7@gmail.com

९७६६११५००८


प्रस्तावना: 

आज भारतीय समाजातील वाढत्या आत्महत्या ही अत्यंत धोकादायक अशी सामाजिक समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आहे . वाढत्या आत्महत्या हे चिंतेची गोष्ट आहे . आज आपण खूप सारी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती केली आहे पण आपल्याला अजूनही मानसिक शांती , निराशा , चिंता ह्यातून बाहेर पडून सामाजिक समतोल राखता आलेला नाही. हे आत्महत्येच्या दरावरून अपल्याला दिसून येते. आज व्यक्तींचा कल हा आधुनिकतेकडून चंगळवादाकडे वाढलेला दिसून येतो आहे. त्यामुळे समाजातील नागरिक विशिष्ट दबावाच्या वातावरणामध्ये जीवन जगताना दिसून येत आहेत. अनेकांना अनेक प्रकारचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, संस्कृतिक ताण-तणाव आहेत, त्यातून व्यवस्थित बाहेर पडता न आल्यामुळे जीवन संपवण्याची मानसिकता मानवी समाजात दृढ होताना दिसत आहे. होणारा ताण असह्य न झाल्यामुळे व्यक्ती आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे अमूल्य जीवन संपवत आहे. आत्महत्या ह्या एका विशिष्ट गटाच्या/समुदायाच्या होत नाहीत तर त्या सर्व समाजामध्ये होताना दिसून येतात. त्यात स्त्री-पुरुष आणि विविध वयोगटातील व्यक्ती या सर्वांचा समावेश ह्या आत्महत्येच्या सामाजिक समस्यांमध्ये होताना दिसत आहे.


गृहीतकृत्य


१) समाजातील बहुतांशी व्यक्ती ह्या विविध प्रकारच्या मानसिक आजारामुळे आत्महत्या करतात.


२) व्यक्तींना जीवन जगताना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो, हे चढ-उतार सहन न झाल्या मुळे व्यक्ती आत्महत्येसारख्या निर्णयप्रत पोहोचतो.


उद्दिष्टे

१) भारतीय समाजातील आत्महत्यांची स्थिती व कारणे समजून घेणे.


२) एमिल दुर्खीम या विचारवंतांचा आत्महत्येचा सिद्धांत पडताळून पाहणे.


संशोधन पद्धती


सदरील संशोधन करण्यासाठी प्राथमिक व दुय्यम तथ्य संकलन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे . त्यात मुलाखती, निरीक्षण, सर्वेक्षण , संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्रांमधील लेख, सरकारी कार्यालयांचे अहवाल ,सामाजिक संस्थांचे निरीक्षणे, समाज माध्यमातून मिळालेली माहिती याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे.


सैद्धांतिक दृष्टीकोन


एमिल दुर्ख़ाइम यांनी त्यांच्या १८९७ च्या lee suicide नावाच्या ग्रंथात आत्महत्या संबंधी विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते आत्महत्या ही एक सामाजिक घटना असून ती समाजाच्या विघटनातून निर्माण होते. आत्महत्या हे एक सामाजिक सत्य असल्यामुळे आत्महत्येचे विश्लेषण सामाजिक कारणांच्या संदर्भातच केले पाहिजे असे मत दुर्खीम यांचे आहे. जोपर्यंत गरजा व साधने यांचा मेळ बसत नाही तोपर्यंत व्यक्ती सु:खी असत नाही, दुःखी व्यक्ती आत्महत्येचा मार्ग जवळ करतात. आजच्या औद्योगिक समाजात मोठ्या प्रमाणात सामाजिक रचनेत बदल, सामाजिक एकतेचा व नीतिमत्तेचा ऱ्हास, व्यक्तिस्वातंत्र्याची वाढ, असंतुलित सामाजिक संबंध आणि व्यक्तिवादी विचारसरणी यासारखी सामाजिक कारणे आत्महत्येला जबाबदार असतात, असे एमिल दुर्खीमचे मत आहे. त्यामुळे त्याने आत्महत्या ही सामाजिक कारणांतूनाच घडते असे ठामपणे सांगितले. दुर्खीमने आत्महत्येचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. 

१) आत्मकेंद्री अथवा अहंमवादी आत्महत्या: समाजातील प्रत्येक व्यक्ती आपला अहंकार जपण्याचा प्रयत्न करते हा अहंकार स्तुतीने सुखावतो आणि निंदेने दुखावतो. एकात्म समाजात व्यक्तीच्या अहंकारावर विविध सामाजिक नियमाद्वारे काही बंधने घातली जातात. भावनात्मक सहानुभूती दाखवली जाते. ह्यास्थितीत व्यक्ती समाजापासून दूर जाते आणि आत्महत्येचा मार्ग जवळ करू लागते. आधुनिक समाजात आत्मकेंद्री आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते कारण हा समाज व्यक्तिवाद, स्वार्थी वृत्ती आणि व्यक्तिनिरपेक्षसंबंध इत्यादींवर आधारलेला आहे. हीच अहंमपणाची भावना व्यक्तीला संपविण्यास कारणीभूत ठरते. 

२) परार्थवादी किव्हा परहितवादी आत्महत्या: दुसऱ्याच्या हितासाठी केलेली आत्महत्या म्हणजे परार्थवादी आत्महत्या होय. या प्रकारात व्यक्तीपेक्षा समाजातील विशिष्ट घटकाला अधिक महत्त्व प्राप्त होते. जेव्हा व्यक्तीवर पूर्णता गटाचे वर्चस्व असते तेव्हा व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्या पेक्षा समाजासाठी आत्मसमर्पण करते, त्यास परार्थवादी आत्महत्या असे म्हंटले जाते.


३) प्रमाणकशून्य अथवा निराशावादी आत्महत्या: दुरखिमच्या मते जेव्हा समाजामध्ये आकस्मिक किंवा अचानक बदल घडून येतात आणि व्यक्तींना अशा बदलाशी समायोजन साधता येत नाही, तेव्हा त्यांच्याकडून प्रमाणकशून्य आत्महत्येचा मार्ग अवलंबिला जातो.


मूल्यमापन: 


एमिल दुरखिंमच्या वरील विश्लेषणातून एक गोष्ट लक्षात येते की व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी समाज हा घटक मजबूर करतो व काही वेळास व्यक्ती स्वतःमधील कमतरता किंवा अपयश पचवण्यासाठी आत्महत्या करत असतो. भारतीय समाजाच्या बाबतीत पहिले तर व्यसनाधीनता, बेरोजगारी, गरिबी, निसर्गाची अवकृपा, शेतमालाला योग बाजारभाव न मिळणे, सोशल मीडियाचा अतिवापर, निराशा, मानसिक ताण-तणाव, शारीरिक व्याधी, गुन्हेगारी, कुटुंबासोबत व समाजासोबत योग्य समायोजन न साधता आल्यामुळे होणाऱ्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अश्या विविध कारणांमुळे समाजात आत्महत्या वाढत असलेल्या दिसून येतात.


उपाययोजना: 

समाजातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे, त्या पुढीलप्रमाणे. 

१) व्यक्तीचा मानसिक ताण- तणाव ओळखून समुपदेशन कारणे आवश्यक आहे.

२) निराशे मध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे प्रबोधन करून त्या व्यक्तीचे मन इतर ठिकाणी कसे रमावता येयील ह्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

३) सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तींना त्याचे फायदे-तोटे व्यवस्थित समजावून सांगून त्यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे.

४) अपल्पभुधरक शेतकरी आणि शेतमजुर यांना आर्थिक लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. 

५) बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्व स्तरावर सकारात्मक प्रयत्न केला जायला हवा.

६) कुटुंबात, समाजात व मित्रांच्या गटांमध्ये एकमेकाला समजून घेऊन व्यक्तिमत्वविकास करणे गरजेचे आहे. 

७) व्यक्तींनी एकमेकाच्या सुख, दुःखात एकमेकांना आधार देणे गरजेचे आहे. जेणेकरून व्यक्ती एकटा पडणार नाही, ह्याची काळजी घ्यावी.


निष्कर्ष: 

१) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेती समस्या जबाबदार आहेत.

२) आत्महत्यांसाठी सामाजिक परिस्थिती जबाबदार असल्याचे दिसते.

३) ४०% आत्महत्या ह्या मानसिक आजारमधुन घडून येतात.

४) स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये आत्महत्येची संख्या जास्त आहे.

५) आत्महत्येसाठी मानसिक ताण-तणाव जबाबदार असलेले दिसून येतात.

६) व्यक्तींची सामाजिक स्थिती आणि आर्थिक स्थिती आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे दिसून येते.


संदर्भ सूची: 

 Ahuja, R. (2014). Social problems in India. Jaipur: Rawat Publications.


Thorat, S. (2009). Dalits in India: Search for a common destiny. New Delhi: SAGE Publications India Pvt.


सुधा काळदाते (२००९) भारतातील समाज प्रश्न आणि समस्या, विद्या बुक बुक पब्लिकेशन, औरंगाबाद.


डॉ. राम आहुजा, सामाजिक समस्याएँ और सामाजिक परिवर्तन, मीनाक्षी प्रकाशन जयपुर (राजस्थान)


कुलकर्णी पी. के.(१९९८),भारतातील सामाजिक समस्या, नागपुर विद्या प्रकाशन.


आगलावे प्रदीप (२००९), भारतातील समाज प्रश्न आणि समस्या, नागपूर श्री.साईनाथ प्रकाशन.


संघावे विलास


(१९९१),भारतातील सामजिक समस्या, कोल्हापूर पॉप्युलर प्रकाशन.

भित्तिपत्रिका अनावरान

 आज दिनांक 05/01/2022 रोजी कन्या महाविद्यालय मिरज, समाजशास्त्र विभागातर्फे "समाजशास्त्रज्ञांची ओळख" ह्या विषयवार भित्तीपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या. डॉ.शर्वरी कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गंगाधर चव्हाण , भित्तीपत्रिका प्रमुख डॉ. कविता सुल्ह्यान , प्रा.विनायक वानमोरे, डॉ.शबाना हलींगळी , डॉ.विनायक पवार आणि समाजशास्त्र विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.




महिलांचे सशक्तीकरण काळाची गरज

 *महिला सशक्तिकरण/सक्षमीकरण भारतीय समाजाची गरज*


प्रा. गंगाधर चव्हाण 

कन्या महाविद्यालय मिरज

Gmil ID: chavangangadhar7@gmail.com

Mi.9766115008


आजच्या काळात महिला सशक्तीकरण हा चर्चेचा विषय बनला आहे. खासकरून मागासवर्गीय व प्रगतशील देशांमध्ये महिला सशक्तिकरणावर भर दिला जात आहे. कारण आज प्रत्येकाला कळून चुकले आहे की देशातील स्त्रियांच्या प्रगती शिवाय देशाची प्रगती शक्य नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता" अर्थात जेथे नारीची (स्त्रीची) पूजा केली जाते तेथे देवाचे स्थान असते अशा पद्धतीने स्त्रियांना मान देण्यात आला आहे.परंतु आजच्या समाजाची विडंबना पहा, स्त्री मध्ये एवढी शक्ती असतानाही देशातील अनेक भागांमध्ये तिला अशिक्षित, असक्षम आणि हिन भावनेने पाहिले जाते. एका राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार संपूर्ण समाजाला कळावे यासाठी जगभरात ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि मातृ दिवस यासारखे स्त्रियांचे दिवस साजरा करून त्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या देशात समाजातील स्त्रियांचे अधिकार आणि मूल्य मारून टाकणाऱ्या कुप्रथा जसे हुंडा, अशिक्षा, लैंगिक अत्याचार, असमानता, स्त्रीभ्रूणहत्या आणि घरेलू हिंसा इत्यादींना बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी असे करतांना आढळत असेल तर त्याला कठोर दंड आणि शिक्षा देण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. 

स्त्रीला सूर्जन शक्ती मानले जाते. म्हणजेच स्त्री मानवजातीचे अस्तित्व आहे. तिच्यामुळेच सृष्टीचे निर्माण झाले आहे. म्हणूनच स्त्री ला संपूर्ण सामाजिक, आर्थिक, राजनैतिक , संस्कृतिक , वैचारिक , धार्मिक आणि शैक्षणिक इत्यादींचे अधिकार देणे आवश्यक आहे. रोजगार, शिक्षण आणि आर्थिक व्यवहारात स्त्रीला पुरुषांप्रमाणेच अधिकार दिले गेले पाहिजे. इत्यादी गोष्टींची पूर्तता केल्यास एक स्त्री संपूर्णपणे सक्षम आणि सशक्त होईल. आपले निर्णय स्वतः घेण्यास ती पूर्णपणे तयार झालेली असेल.

आज भारत शासनाद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिला व बाल विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे महिलां सशक्तीकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर स्त्रियांना मालमत्तेचा हक्क, मतदानाचा अधिकार, नागरी हक्क, विवाह आणि नोकरीच्या बाबतीत कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. महिला आणि किशोरवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक कल्याणकारी योजना सरकार चालवत आहेत. किशोरी कौशल योजना, बेटी बचाव बेटी पढाव योजना, महिला हेल्पलाइन योजना, उज्वला योजना, सपोर्ट टू त्रेनिंग अंड एम्पलोयमेंन्ट प्रोग्रम फोर वुमन, महिला शक्ती केंद्र आणि पंचायती मध्ये महिलांसाठी आरक्षण इत्यादी काही प्रमुख महिला सशक्तिकरण योजना भारत शासनाद्वारे राबविण्यात येत आहे.

आज भारताची जलद होणारी आर्थिक प्रगती पाहता लक्षात येते की येत्या काही वर्षांमध्ये भारत महिला सक्षमीकरणाचे ध्येय साध्य करेल. परंतु लवकरात लवकर संपूर्ण देशातील महिलांना सशक्त करण्याकरिता योग्य निर्णय आणि उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शासनाने व देशातील जनतेने महिला सक्षमीकरणाची आवश्यकता समजून घ्यायला हवी व याविषयी जास्तीत जास्त लोकांमधे जन-जागृती निर्माण करायला हवी. जर या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर येत्या काही वर्षातच भारतातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करताना दिसून येतील यात शंका नाही.


*स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय*? 


कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे या प्रक्रियेला स्त्री सक्षमीकरण असे म्हणतात.


संशोधनाची उद्दिष्टे : 

१) महिलांच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करणे. 


२) महिला सक्षमीकरणासाठी उपाय सुचवणे. 


३) शासनाच्या महिला संदर्भातील योजनांचा आढावा घेणे. 


संशोधन पद्धती : सदरील संशोधन करण्यासाठी प्राथमिक व दुय्यम तथ्य संकलन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यात मुलाखत अनुसूची, निरीक्षण, सर्वेक्षण, संदर्भ साहित्य, वृत्तपत्रातील लेख, सरकारी व खाजगी कार्यालयाचे अहवाल, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेली माहिती यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न सदरील संशोधन करण्यासाठी केला आहे.


महिला सक्षमीकरणाचे घटक : 


१) लिंगभेद असमानता दूर करणे : लिंगभेद हे एखाद्या व्यक्तीचा लिंग किंवा लिंगावर आधारित पूर्वाग्रहवरुन भेदभाव करणे होय. लिंगभेद कोणासही प्रभावित करू शकतो, परंतु प्रामुख्याने महिला आणि मुलींवर याचा परिणाम होतो. कुटूंब, शाळा व समाजात मुलगी मुलगा भेदाभेद होता कामा नये, समाजातील व्यक्तींचे समजिकरण करत असताना सगळ्यांना समानतेचे शिक्षण देणे गरजेचे आहे.तरच आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो.


२) मुलींची शिक्षणातील गळती कमी करणे : सर्वांना शिक्षण मिळाले तरच सामाजिक प्रगती व्यवस्थित होऊ शकते. समाजातील कुठलाही घटक शिक्षणापासून जर वंचित राहिला तर सामाजिक प्रगती होत नाही. त्यातली त्यात मुलींच्या शिक्षणाकडे समाजाणे व कुटुंबाने सकारात्मक दृष्टिकोनातून न पाहिल्यामुळे जास्तीत जास्त मुली ह्या शिक्षणापासून वंचित राहतात. ज्या विवीध कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात ते कारणे शोधून त्यावरील उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे.


३) महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे : महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावू शकतो. त्यांना कुटुंबात, समाजात मानसन्मान मिळू शकतो. त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार या त्रिसूत्रीचा अवलंब करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाऊ शकते. त्यांच्या व्यावसायासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन आर्थिक उन्नत केले जाऊ शकते.


४) महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होणे गरजेचे आहे : महिलांच्या बाबतीतील समाजात अन्याय-अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत जात असलेले आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्या समान अधिकारांची जाणीव महिलांना होणे गरजेचे आहे. कुटुंबात समाजात झालेला अन्याय अत्याचााविरोधात त्यांनी आवाज उठवणे गरजेचं आहे. तरच सर्व महिला आत्मसन्मानाने जगू शकतील. व अन्याय अत्याचाराला बळी पडणार नाहीत. त्यासाठी कायदा साक्षरता शिबिरे घेऊन जनजागृती केली जाणे आवश्यक आहे.


५) महिलांच्या कामाला प्रतिष्ठा देणे : भारतीय समाजामध्ये पुरुषसत्ताक कुटूंब पद्धती असल्यामुळे सगळ्याचं क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व असलेले दिसून येते आणि महिलांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते. त्यांच्या कामाला प्रतिष्ठा दिली जात नाही. आज समाजातील सर्वच क्षेत्रे महिलांसाठी खुली झाली आहेत. त्यांना पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर त्यांच्या कामाला हलके न समजता त्या करत असलेल्या कामाला प्रतिष्ठा मिळवुन देणे ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.


निष्कर्ष :

१) महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठीचे प्रयत्न शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून होत असलेले दिसून येत आहे.

२) सर्वच क्षेत्रांमध्ये महिला उत्तम कामगिरी करत आहेत.


३) महिलांना समान संधी प्राप्त करून दिली तर त्या अजुन चांगले काम करू शकतात.


४) महिलांना कायद्याच्या माध्यमातून साक्षर केल्यास त्यांच्यावर होते अत्याचार कमी होऊ शकतात. 


५) महिलांना आर्थिक सक्षमता येण्यासाठी कुटुंबाने व समाजाने प्रयत्न केल्यास त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होईल.


६) समाजातील लिंगभेद असमानता दूर केल्यास, महिला देखील आत्मसन्मानाने जीवन जगताना दिसून येतील.


७) महीला वर्ग सक्षम झाल्यास समाज सक्षम होण्यासाठी वेळ लागणार नाही.


मूल्यमापन : 


महिला सक्षमकरणासाठी वरील सर्व घटकांचा सकारात्मक विचार केल्यास महिला सक्षमीकरण होण्यासाठी वेळ लागणार नाही. कायदे, समाज,कुटूंब, शासन एन. जी. ओ. यांनी प्रबोधनाच्या ,योजनांच्या माध्यमातून जन-जागृती केल्यास महिलांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपायांच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांच्या अनेक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी सामाजिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. सकारात्मक प्रयत्न झाल्यास सामाजिक प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. 


संदर्भ सूची :


Kabeer, Naila. "Gender equality and women'empoverment: A critical analysis o the third millennium development goal 1." Gender & Development 13.1 (2005): 13-24.


 Mosedale, Sarah (2005-03-01). "Assessing women's empowerment: towards a conceptual framework". Journal of International Development. 17 (2): 243–257. doi:10.1002/jid.1212. ISSN 1099-1328.


 Bayeh, Endalcachew (January 2016). "The role of empowering women and achieving gender equality to the sustainable development of Ethiopia". Pacific Science Review B: Humanities and Social Sciences. 2 (1): 38. doi:10.1016/j.psrb.2016.09.013.


 Oxfam (Forthcoming), "Women's Economic Empowerment Conceptual Framework"


गायकवाड व्ही. बी.,_भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने", महाराष्ट्र टाइम्स १मे २०१७


धोंडगे अश्विनी, " बदलाच्या शोधतील ग्रामीण स्त्री",लोकसत्ता, २९ ऑगस्त २०१५ 


महिला व बाल विकास विभाग , "महीला धोरण २०१४", मंत्रालय मुंबई.

कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट

कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट  कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभ...