"घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरातच असते," अशी स्वतःची ओळख भारतातल्या करोडो बायका रोज करून देत असतात.
आपल्याकडे स्त्री घरकाम करते, त्यामागील ती घेणाऱ्या कष्टाची, प्रेमाची जाणीव आणि कौतुक तर दूरची गोष्ट, पण साधी ओळखही ठेवली जात नाही. भारतामध्ये स्त्रीनं चूल आणि मूल सांभाळावं ही धारणा फार जुनी आहे. आता जरी मुली शिकल्या तरी या धारणेत फारसे बदल झालेले दिसत नाहीत. याउलट आता घराबाहेर जाणाऱ्या स्त्रियांना गृहिणीपद सांभाळून कामाला जावं लागतं. मुलींना शिक्षणाबरोबरच उत्तम गृहिणी कसं बनायचं याबद्दलचं शिक्षणही दिलंच जातं.
लापता लेडीज सिनेमात मंजू मावशी या पात्राच्या तोंडचा एक डायलॉग आहे, " इ देश में लड़की लोगोंको साथ हजारों सालों से फ्रॉड हो रहा है, ऊका नाम है भले घर की बहु बेटी।” चांगली गृहिणी आदर्श स्त्री असते. म्हणून मुलींना लहानपणापासून गृहिणी होण्याचे धडे दिले जातात. स्त्रीने करिअर केले नाही तरी चालते पण तिनं उत्तम गृहिणी असावं ही पूर्वअट असते. तशी ती पुरुषांना नसते. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा, "माझ्या आईला रोज जेवण बनवून सगळ्यांना खायला घालायला खूप आवडतं. तिची चॉईस आहे ती!" मी विचारायचे, "बाकीच्या कोणत्या चॉईसेस उपलब्ध आहेत तिला?स्वयंपाक न करण्याची चॉईस घेऊ शकते का ती?" गृहिणी असण्याला रोमिंटीसाईज केलं जातं. करोना काळात एक करोना झालेली आई ऑक्सिजन सिलेंडर लावून स्वयंपाक करतानाचा फोटो"अशी शेवटी आई असते" अशा कॅप्शनसह झळकला होता. कोणत्याही स्त्रीला गृहिणी बनायचं आहे का असा कुणीही प्रश्न विचारत नाही, गृहीत धरलं जातं.
गृहिणीपद सांभाळण्याला मानाचे स्थान नाही आणि त्या बदल्यात त्यांना काही आर्थिक मोबदलाही मिळत नाही. जेव्हा मोबदल्याचा विषय येतो तेव्हा घरातले सगळेच म्हणतात, "घरातली स्त्री प्रेमानं खायला घालते, त्याचे ती पैसे थोडेच घेणार?" हीच कामं बाहेरून करून घेतली तर किमान दोन अंकी आकड्यात पगार द्यावा लागतो. मात्र घरात रात्रंदिवस राबणाऱ्या बाईच्या वाट्याला ना कौतुक येतं ना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळतात. घरकाम पुनरुत्पादित काम आहे असे मानलं जात नसल्यानं ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. परिणामस्वरूप घरकामाला आर्थिक मूल्य आहे असं समजलं जात नाही.
ग्रामीण भागात जन्म झाल्यानं लहानपणापासून तिथल्या स्त्रिया कशा पद्धतीनं घरातली, रानातली कामं करतात, नवऱ्याला, लेकरांना खुश करतात हे पाहत आली आहे. हे सगळं करून शेवटी बायकोला नवऱ्याच्या लाथाच खाव्या लागतात. हातात एक रुपया पण नसतो. अन मरेपर्यंत असंच आयुष्य काढावं लागतं. याला काही पर्याय आहे असा विचारही कुणाच्या मनात येत नव्हता. लहानपणापासून एक मुलगी म्हणून मी ही पाहत आले होते. बायका हे सगळं सोडून पळून का जात नाहीत आपल्या आई वडिलांकडे? नवरा इतका वाईट आहे तरी त्याच्या लाथा सहन करत त्याला लागतं म्हणून गरम चपाती, भाकरी, कालवण त्याच्या ताटलीत का वाढतात?बायका एवढं कष्ट करतात तर त्यांना काहीच पैसे कसे मिळत नाहीत? त्या नवऱ्याला सोडून का जात नाहीत? बायकांना घरात किंमत का नाही?बायका इतकी कामं का करतात? हे सगळे प्रश्न अजूनही तसेच आहेत. मग लक्षात येतं की मुळात संकुचित लग्न व्यवस्था मुळाशी आहे. ही व्यवस्था महिलांना सत्ताहीन ठेवते.
कॉलेजला असताना इंग्रजी साहित्यात अरिस्टिक्रेटिक कुटुंबं या समूहाबद्दल वाचायला मिळालं ज्याच्या आलिशान जीवन जगण्याच्या पद्धती, सामाजिक संकेत ठरलेले होते. त्यातल्या बायका मला माझ्या गावाकडच्या बायकांसारख्याच वाटल्या. सगळ्या गृहिणी. नवऱ्यासाठी नटायचं, मुलं मोठी करायची हेच काम. कपडे कसे घालायचे, चालायचं, बोलायचं, उठायचं, बसायचं कसं याचं रीतसर प्रशिक्षण मिळायचं त्यांना. अगदी पापणी कशी हलली गेली पाहिजे इथवर. आणि हो, नवऱ्याला कसं खुश ठेवायचं हेही त्यांच्या आया त्यांना शिकवायच्या. या स्त्रिया दिवसभर कुकिंग, विणकाम, बागकाम शिकायच्या. संध्याकाळी जेवण बनवून नवऱ्याची वाट पाहायच्या. त्यांच्यात आणि माझ्या गावाकडच्या बायकांच्या त एकच महत्त्वाचा फरक होता, त्या अतिशय श्रीमंतीत, खाऊन पिऊन होत्या आणि माझ्या गावाकडच्या बायका गरिबीत, हातात कवडी नसतानाही राबत होत्या. बाकी दोघीही ते करत होत्या...नवरा, मूल, घरकाम. गावातल्या दहावीपर्यंतच्या मुलीही आता फक्त गृहिणीपद भुषवतात. नवरा, मुलं, कार्यक्रम, सणवार, उपवास करतात.
कॉलेजातील मुलींचेही तेच अवतार. बोटावर मोजण्याइतक्या नोकरी करणाऱ्या. कायम नवऱ्याने म्हणेल तेच करणाऱ्या. काहींचे तर कायम डोक्यावर पदर असणारे फोटो. त्यांचे प्रोफाईल पिक्चरही मुलं नाही तर नवरे. त्यांचे साधे फोटोही त्या प्रोफाईलला लावत नाहीत. म्हणजे माझ्या लहानपणी जे चित्र होतं ते अजूनही तसंच आहे.
एक भयानक सिनेमा मध्यंतरी पाहिला होता, The Stepford Wives. यात नवरे आपल्या बायकांचं परफेक्ट आणि जास्त क्रियाशील अशा रोबोट बायकोमध्ये, गृहिणीमध्ये रूपांतर करत असतात, जी नेहमी मधाळ बोलते, सगळी कामे करते हे दाखवण्यात आलं आहे.
ओहीओ स्टेट युनिव्हर्सिटीमधील सहाय्यक प्राध्यापक आणि नामवंत लेखक क्लेर कॅम्प डश यांच्या अभ्यासानुसार, समतावादी मानणाऱ्या कुटूंबातही फक्त महिलाच घरातील कामं करताना आढळतात. घरगुती कामात पुरुष फार कमी वेळा मदत करतात. त्यामुळे समतावादी किंवा स्त्री-पुरुष समानता ही केवळ मानण्याची आणि बोलण्यापुरची गोष्ट राहिली असून प्रत्यक्षात आचरणात आणलीच जात नाहीत. स्त्रियांचे श्रमातील एकूण योगदान, त्यांचं गृहिणी असणं याबाबतीतील पुढील आकडेवारी विचार करायला लावणारी आहे.
१."जगातल्या एकूण कामांपैकी ६०% काम स्त्रिया करतात, ५० अन्न उत्पादन करतात; मात्र एकूण उत्पन्नाच्या फक्त १०% कमावतात आणि १% संपत्तीची मालकी त्यांच्याकडे आहे." (ऑक्सफॅम् अहवाल, २०१३, भारत)
२. शेतीची ८०% कामे महिला करतात, फक्त १३% जमिनीची मालकी-(ऑक्सफॅम् अहवाल, २०१३, भारत) स्त्रिया गृहिणी म्हणून आयुष्यभर राबतात, मात्र त्या कधी मालकीण बनत नाहीत.
३. जगभरातील महिला पुरुषांच्या तुलनेत प्रत्येक आठवड्यात ८ तास अधिक काम करतात. कार्यालयातून आल्यानंतर घरकामाची जबाबदारीही महिलांवरच असते. घरकामासाठी महिला पुरुषांच्या तुलनेत १८ तास अधिक वेळ देतात. घर आणि कार्यालयाच्या कामाला एकत्र केले तर महिला ८ तासांनी पुढे आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा अधिक काम करूनही महिलांच्या कामाची उत्कृष्टता २ टक्क्यांनी जास्त आहे. महिलांना कामासाठी प्रत्येक तासाला पुरुषांपेक्षा जवळपास २६८ रुपये कमी मिळत आहेत.
४. स्त्री पुरुष आर्थिक, राजकीय, सामाजिकदृष्ट्या अंतर: १५६ देशात १४० वा क्रमांक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा "ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०२१”
गृहिणी असण्याचं फक्त भारतात उदात्तीकरण होतं असं नाही. एक रिल पाहण्यात आला ज्यात एक परदेशी स्त्री ट्रॅड वाईफ बनणं कसं योग्य आहे हे सांगत होती. जगभरात हजारो, लाखो स्त्री, पुरुषांनी स्त्रीयांना त्यांच्या पारंपरिक जबाबदाऱ्यातून मोकळं करून त्यांना त्यांच्या करिअर, प्रगतीसाठी आकाश खुलं करून देण्यासाठी खस्ता खाल्ल्या, ते एका क्षणात शून्य होऊ पाहतं आहे. गृहिणीपद सांभाळण्यात स्त्रिया इतक्या मग्न झाल्यात की त्या स्वतःच्या मूळ रूपाला, अपेक्षांना विसरल्या आहेत. लापता लेडीजमध्ये एक डायलॉग आहे. "तो का अब औरतोंकी पसंद का खाना बनेगा? दिक्कत तो इ है कि हमको अब वो भी याद नहीं है कि हमको क्या पसंद है?" अशी अवस्था भारतीय गृहिणींची झालेली आहे.
आधी आई, बहिण आणि नंतर बायको अशा "सेवा पद्धती"चा फायदा घेणाऱ्या पुरुषांनी आणखी खोलात विचार करण्याची गरज आहे. गावी एक भाऊ म्हणालेला, " बायको सेवा करण्यासाठी नसते तर कशासाठी असते?" त्याला धर्माने, समाजाने, पितृसत्ताक पद्धतीने हेच शिकवले आहे, तो वेगळं काय बोलला. न्यायालयाने अनेकदा यावरून पुरुषांना ठणकावून सांगितले आहे की स्त्रियांकडून घरकाम करून घेण्यासाठी स्त्री ही पुरुषाची दासी नव्हे, तर तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका निवाड्यात न्यायालय नवऱ्याला म्हणते की ' रुचकर जेवण हवे असेल तर स्वयंपाकी नेमा, त्यासाठी लग्न करू नका.'
खरं तर गृहिणीपद सांभाळण्यात तसं काहीही गैर नाही. कुटुंब नीट चालण्यासाठी कामांची विभागणी करावी लागेल. मात्र हे विभाजन भेदभाव करणारं नसावं. घरातली कामं जर सगळ्यांनी मिळून करायची ठरवली तर गृहिणी बनून सगळ्याच जबाबदाऱ्या अंगावर पडलेल्या स्त्रीला थोडी उसंत मिळून तिलाही तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी करता येऊ शकतील. स्त्री एकदा का गृहिणी झाली की तिच्या अनेक अपेक्षा, स्वप्ने घरातच विरली जातात. सतत फक्त घरकाम करत राहिल्यानं स्त्रियांमधील क्रियेटीव्हिटी मरते, आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. शिवाय वरून नवऱ्याकडून "तुला काडीचीही अक्कल नाही, तू आपलं घरच सांभाळ," असंही ऐकवलं जातं.
घरकामात पुरुष, मुले "मदत" वरून जबाबदारी घेण्याकडे हळूहळू जात आहेत, पण तरी बहुतांश घरकामाचा बोजा अजूनही स्त्रियांवर आहे. संपूर्ण समाज एका पातळीवर येईस्तोवर स्त्रियांना त्यांच्या कामाची ओळख आणि दर महिन्याला फक्त तिच्या खर्चासाठी (ज्याचा हिशेब तिला कुणी विचारणार नाही) पैसे मिळायला हवेत. तिच्या स्वतःच्या गरजा असतात हे मान्य करायला हवे. दरवेळी तिने अगदी दहा रुपयांसाठी नवऱ्यासमोर हात पसरावा ही नवऱ्या साठी निश्चितच गौरवाची बाब नाही. खरं तर तिच्या खर्चासाठी पैसे देणं ही "भरपाई" नाही, तिच्यावरील " प्रेम" आणि "कामाचा सन्मान"आहे.
कोण कोणतं काम करतं यात लवचिकता हवी, एकाच व्यक्तीवर एकाच कामाची जबाबदारी नसावी. यात "स्त्रियांच्या" आणि "पुरुषांच्या" कामाची ठराविक चौकट स्त्रियांनी बऱ्याच प्रमाणात मोडत आणली आहे, आता पुरुषांनी आणखी वेगात पाऊले टाकायची गरज आहे. " घरकाम स्त्रियांचे काम आणि स्त्रियांचे काम म्हणजे हलक्या दर्जाचे काम" ही विचारसरणी जशी स्त्रियांसाठी त्रासदायक तशी पुरुषांसाठीसुद्धा नुकसानकारक आहेच. ' प्रेमाचा मार्ग पोटातून जातो ' आणि स्वावलंबीत्व या दोन्ही बाबी पुरुषांसाठी ही महत्त्वाच्या आहेत. घर, किचन हा प्रेमाचा झरा नक्कीच असू शकतो जेव्हा तिथे सर्वांचा वावर असेल.
आपले आई वडील कोणत्या भूमिका पार पाडतात, त्याच भूमिका मुले उचलतात. मुलांना 'चांगलं माणूस' बनवायचं असेल तर दोघांनाही घरकाम यायला हवे. वडिलांनी आईच्या कामाला सन्मान दिला, घरकामाची जबाबदारी घेतली तर मुलगेही घेतील. मुलग्यांचे संसार आणि आरोग्य वाचवायचे असेल तर मुलांनाही घरकाम शिकवावं. मुली सक्षम होत आहेत, "मीही शिकले आहे, नोकरी करते, मीच का करू?" असा सवाल मुली करत आहेत. गृहिणी होण्याचं नाकारत आहेत. शिवाय आजकाल शहरात मुला दोघांनाही स्वयंपाक येत नाही, घरात "स्विगी, झोमॅटो ऑर्डर " सिस्टम सुरू आहे. घरकाम या विषयावरून घटस्फोटही होत आहेत. त्यामुळं लग्नाआधी घरकामावर सांगोपांग चर्चा, विचार विनिमय करण्याची गरज आहे. एकट्या स्त्रीवर ती जबाबदारी टाकल्याने तीही सुखी आणि आनंदी नाही. घरकामाकडे एक काम,कौशल्य म्हणून पाहिले गेले तर ते जेंडररहित होईल...ती स्त्री किंवा पुरुषाची जबाबदारी राहणार नाही.
'समतेवर बोलायचे असेल तर आधी तू तुझी चड्डी धुवायला शिक ' विरोधक गँगनी चड्डी धुणे ही एवढीच सोपी आणि तकलादू गोष्ट असेल तर खरंच फक्त स्वतःचीच नव्हे तर आई, बहिण, बायको, वडील, भाऊ, मुलं या सर्वांच्याच चड्ड्याच नाहीतर सगळे कपडे महिनाभर धुवावेत आणि मग 'फेमिनिस्ट' स्त्रियांची जिरवावी. घरकाम, स्त्रीची लैंगिकता कमी महत्त्वाच्या गोष्टी आणि रोजगार किंवा इतर बाबी जास्त महत्त्वाच्या हेही पुरुष पुरस्कृत मिथक आहे. पुरुष स्त्रीच्या प्रवासातील सोबती आहे, त्याने तिच्या हातात हात घालून सावलीसारखी सोबत करावी.
स्त्री पुरुष समता फक्त स्त्रीने सक्षम होऊन येणार नाही; काही सत्ता, फायदे पुरूषालाही सोडावे लागतील. सत्ता वाटण्यात आनंद असतो ही विचारसरणी रुजवायला हवी. मग पुरुषाचा प्रवास माणूस बनण्याकडे होईल आणि स्त्रीला तिचे इतर कलागुण जोपासणे, व्यायाम, करिअरवर लक्ष केंद्रित करणे, नवनिर्मिती करणे या गोष्टींसाठी वेळ मिळेल. स्त्री मग बिंदास्तपणे माहेरी राहू शकेल आणि निश्चिंतपणे जगभ्रमंतीसुद्धा शकेल. "मी नसेल तर माझ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या जेवणाचे काय होईल?" हा प्रश्न छळणार नाही तिला.
गृहिणी म्हणून स्त्री घेत असलेल्या जबाबदाऱ्यांना पुरुष म्हणून नव्हे तर माणूस म्हणून डोळसपणे पाहणं, तिच्या खर्चासाठी पैसे देणं, तिला घरात व इतर संपत्तीत संयुक्त मालकीण करणं, पुरुष भाऊ असेल तर तिच्या हक्काची वडिलार्जित संपत्ती देणं हेही करावं लागेल. ते आपल्या खऱ्या प्रेमाला "पूर्णत्व" येईल.
आज राष्ट्रीय गृहिणी दिवस आहे. स्त्रीच्या गृहिणी असण्याला ओळख, पोचपावती, सन्मान देण्याचा दिवस. गृहिणी होणं निवडीचा भाग असला पाहिजे. पुरुषांनाही पूर्ण वेळ घर सांभाळण्याची चॉईस सहजपणे घेता यायला हवी. घरकामाला कौतुक, सन्मान आणि ‘मोबदल्याची शिदोरी' मिळायला हवी. स्त्रीनं सुपर वूमन मागील राजकारण समजून घेऊन त्या मायाजालात न अडकता आपल्याला हव्या त्या गोष्टी करण्यात वेळ घालवावा. गृहिणी असणं ही चॉईस आहे, तसं गृहिणी असतानाही मोकळा श्वास घेण्यासाठी जागा तयार करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे.
- लक्ष्मी यादव
मान हवा आणि मानधनही!
महाराष्ट्र टाईम्स, ३ नोव्हेंबर २०२५




















































